वाई तालुक्यात पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि रस्त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक मोठे आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. चालू वर्षात विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध रस्त्यांच्या कडेला सुमारे ३,५०० वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा नुकताच शानदार शुभारंभ करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मा. राहुल अहिरे आणि वाई उपविभागाचे उपअभियंता महेश गोंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवला जात आहे.
मुक्तागिरी वृत्तसेवा
वाई :
वाई तालुक्यात पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि रस्त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक मोठे आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. चालू वर्षात विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध रस्त्यांच्या कडेला सुमारे ३,५०० वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा नुकताच शानदार शुभारंभ करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मा. राहुल अहिरे आणि वाई उपविभागाचे उपअभियंता महेश गोंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवला जात आहे. निसर्ग आणि मानवाचे नाते दृढ करणाऱ्या वटपौर्णिमेच्या सणाचे औचित्य साधून, चांदक (ता. वाई) येथे तेथील स्थानिक महिलांच्या हस्ते मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. केवळ शासकीय औपचारिकता न ठेवता या मोहिमेत लोकसहभाग मिळवण्यासाठी स्थानिक महिलांना अग्रस्थान देण्यात आले होते. यावेळी कनिष्ठ अभियंता संजय सैदाने व त्यांचे सहकारी, ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या. पावसाळ्याचा योग्य फायदा उठवत येत्या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व ३,५०० झाडांची लागवड पूर्ण करण्याचे अचूक नियोजन कार्यालयाने केले असल्याची माहिती उपअभियंता महेश गोंजारी यांनी दिली. रस्त्यांच्या दुतर्फा होणाऱ्या या वृक्षारोपणामुळे भविष्यात वाई परिसरातील रस्ते सावलीने आणि हिरवळीने नटणार असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या 'ग्रीन' उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे.